कैक जन्म आधी असं म्हणतात
तु जन्म घेतला होतास
महिषासुर राक्षसाचा तु
वध म्हणे केला होतास
शृंगार रुप सोडून रौद्र धारण केला होतास
आणि देवांनाही जमलं नाही तो खेळ तु खेळला होतास
जसं तुझं वाहन तशीच हिम्मत तुझी होती
सृष्टीची तारणहार अशी ओळख तुझी होती
तु होतीस पुत्री,भगिनी,माता देखील कोणाची
कोणासाठी जन्मदात्री तर काळ कोणासाठी होतीस
वधानंतर महादेवांनी शांतावल होतं तुला
कुंडात रुप बघुन तु सावरलं होतंस स्वतः ला
पुन्हा दुर्गेची गौरी झाली होतीस
शांतता संयम यांची राज्ञी तु झाली होतीस
आज गरज आहे माते तु पुन्हा दुर्गा बनण्याची
गौरी रुप सोडून पुन्हा रौद्ररूप धरण्याची
आज असुर देखील पूर्वीपेक्षा मोठे आहेत
देवाच्या देखील रुपात बसलेले दिसतील ते खोटे आहेत
संयम शांतता सोडून माते गरज आहे आता उठण्याची
स्वतः च्या शीलासाठी स्वतः च लढण्याची
आज प्रत्येक घराघरात तु जन्म घ्यायला हवास
महिषासुराचा वध हा कानमंत्र तु द्यायला हवास
शांत करायला तुला महादेव धावणार नाहीत
कारण सध्या महिषासुरांची संख्या त्यांना झेपणार नाही
आज तुझी गरज आहे माते पण नाही फक्त तुझ्या एकटीची
तुझ्या सारख्या हजारो व्हाव्यात निर्माण,
गरज आहे त्या शक्तीची.

No comments:
Post a Comment