Friday, 22 July 2016

Airlift






परवा Airlift पाहिला,सद्दाम हुसेन ने कुवेत वर हल्ला केल्याचा तो ९० चा काळ,बघताना माझं बालपण आठवलं,नुकतच मोठ्या शाळेत पाचवी सहावीत गेल्या मुळे घर ते शाळा असं चालत जाण्याचं अंतर वाढलं होतं,त्या काळी स्कुल बस चा प्रघात नसल्यामुळे असेल कदाचित, बहुतेक सगळेच चालत ये जा करत. मोठी मुले मुली फ़ार फ़ार तर सायकल घेउन फ़िरायची.
शाळेतुन परत येताना आमचा छोटा ग्रुप असायचा,सद्दाम हुसेन आणि इराकी युद्द्ध यांच्या बातम्या आमच्या पर्यंत पोहोचत होत्याच,त्या घटनांचा आम्ही आमच्या कुवती नुसार अर्थ लावत होतो,सद्दाम अगदी आमच्यातलाच एक असल्या सारखे त्याचे काय चाललेय आणि आता तो काय करायच्या विचारात आहे याच्या चर्चा चालायच्या,त्यातुन सद्दाम हुसेन ने त्याचे अजुन ६ डुप्लिकेटस कसे बनवले आहेत,मग अमेरिका त्याला पकडुच शकत नाही मग तो bombs कसे प्लांट करणार आहे अशा गोष्टी बोलल्या जायच्या,हा प्रभाव त्याकाळच्या बातम्या आणि आजुबाजुला कानावर पडणार्या बोलण्यावरुन असायचा,पण तेव्हाच्या त्या चर्चा मोठ्यांच्या पेक्षाही जास्त गंभीरपणे चालु असायच्या, अशा गप्पा आणि सद्दाम हुसेन आणि युद्धाच्या कल्पना करत रस्ता कधी सरायचा ते कळायचं नाही,
किती सुखी दिवस होते....कसली चिंता नाही ताण तणाव नाहीत जगात चाललेल्या घडामोडींच्या बद्दल फ़ार भितीही नाही आमचं बालपण असं साधं सुधं आणि सुरक्षितही होतं याचं आता सुख वाटतं!!

24th January 2016

मोगरा










खरं तर बऱ्याच दिवसांनी गच्चीवर गेले होते. गच्चीवर लावलेल्या झाडांना भेटायला! बघते तर शेवंती, गुलाब छान हसत होते; पण मोगरा मात्र पार सुकून गेला होता. त्याच्याकडं बघून खूप वाईट वाटलं आणि स्वत:चाच राग आला. मनाशी म्हटलं, ‘माझंच दुर्लक्ष झालं. रोज नियमित यायला हवं होतं... गेला आता, सुकला माझा मोगरा!!’
त्यानंतर नित्यनेमाने झाडांना पाणी घालण्याचा क्रम सुरू ठेवला. परवा बघितलं तर काय! मोगऱ्याच्या त्या सुकलेल्या कुंडीतुन एक हिरवागार कोंब डोकावत होता. मोगरा जिवंत होता. त्याने परत अंग धरलं.
आपलं आयुष्य पण असंच असावं, नाही का? जरी खत पाणी मिळालं नाही काही दिवस, सूर्यप्रकाश दिसला नाही कित्येक दिवस, तरी तग धरून राहायला हवं. फक्त या आशेवर की पुन्हा दिवस उजाडेल... पुन्हा ऊन पडेल आणि आपल्या आयुष्याला उमेदीचे नवीन धुमारे फुटतील... माणूस कशावर जगत असतो? हवा, पाणी, अन्न....नातेवाइक की मित्रमंडळ? मला वाटतं माणूस फक्त आशेवर जगत असतो... चांगलं घडण्याची आशा,नवीन व्यक्तींची आशा,आणि अशी बरीच कारणं...
हाडं गोठवणारी थंडी असते. वर-खाली सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला असतो. तरीही गिर्यारोहक मात्र एक एक पाऊल टाकत असतो. कदाचित त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षासुद्धा त्याच्या मनातली आशा त्याला शिखरावर पोहोचण्यास मदत करते. आशेवर अनेक संसार चालतात आणि अनेक व्यवसायही... आशावादामुळे जाहिरातींचा बाजार वाढतो आणि जाहिरातींमुळे आशा... आता हा जाहिरातींचा बाजार चांगला की वाईट हे ज्याचं त्याने ठरवायचं... एवढंच काय, तर बऱ्याच भोंदूबाबांचे आध्यात्मिक व्यवसायही माणसांच्या आशा-आकांक्षांशी खेळ करत चालतात. hopes वर माणूस आख्खं आयुष्य कोणाची तरी वाट बघू शकतो. खडतर कष्टप्रद जीवन जगू शकतो आणि धीर धरू शकतो... आशावादी असायलासुद्धा खुप बळ असावं लागतं; कारण निराशावादी लोक नकारात्मक विचार करतात, self destroying... आत्मघाती बनतात किंवा स्वरस नसलेल्या बांडगुळासारखे जगत राहतात. कधी कुठल्या व्यसनात स्वत:ला गुरफटून घेतात आणि आयुष्याची माती करून घेतात... आशा, स्वप्नं ही कधी दुसऱ्यांच्या हिशेबात कितीही अवास्तव असली... तरीही आपल्यासाठी ती सर्व काही असतात. ती उराशी बाळगून जगलं पाहिजे. फुलांबरोबर काट्यांचीही तयारी ठेवली पाहिजे... समस्या असतात, ताण-तणाव असतात; पण त्यांचा तोडगाही असतोच, तोही आपला आपल्याकडे... त्यामुळे आशावादी राहा मित्र आणि मैत्रिणींनो... कारण आयुष्य खुप सुंदर आहे... अगदी मोगऱ्याच्या फुलासारखं!!


सांग सांग भोलानाथ

लहानपणीची आठवण....साधारण ९०-९२ साल असावं....परुळेकर शाळेतले दिवस ११ वाजताच्या शाळेसाठी १०.३० पर्यंत तरी निघावं लागे त्यादिवशी गुरुवार होता बाबांची सुट्टीचा दिवस....तेव्हा केबल सुद्धा नवीन होतं आणि केबलवाल्याकडुन दाखवल्या जाणार्या फ़िल्म्स चं अप्रुप वाटायचं...कारण तेव्हा आजच्यासारखे ढिगभर च्यानल्स नवते आणि थियेटर मधे जाण्याची सक्त मनाई!
त्यादिवशी केबलवाल्याने ’रोजा’ लावला होता,चित्राच्या बारिक आवाजात ’दिल है छोटासा......  बघुन झाल्यावर जड पायांनी निघावं लागलं होतं.....कारण पिक्चर सोडवत नवता पण शाळेला सुट्टीदेखील घेता येणार नवती.....मग काय चालत जाताना डोक्यात तेच विचार घोळत होते....पाउस जोरदार सुरु होता.....शाळेत जाण्याच्या उत्साहाचा आनंदच होता त्यात आज अजुनच मुड ओफ़ ची भर पडली होती.....
शाळेजवळ पोहोचत होतो आणि काही मुलं मुली परत येताना दिसली आणि मग नंतर बरीच.....आमच्या वर्गातली दिसल्यावर त्यांनी सांगितलं "वडगाव कामशेत ला खुप पाउस पडला आणि त्यामुळे लोकल्स बंद आहेत....तिथुन येणारी मुलं येउ शकणार नवती आणि त्यांची संख्या बर्यापैकी होती त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेला सुट्टी दिली होती!!!!!
भोलानाथ ला कधी आर्जव केल्याचं आठवत तरी नाही पण तरी सुट्टी मिळाली!! आम्ही ज्या वेगाने चालत आलो होतो त्याच्या चौपट वेगाने धावत घरी निघालो.....परत उरलेला रोजा बघायला!!